flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग ९ *अध्यात्मिक मूल्ये निर्माण होताच शुभ वासनांचा प्रसार वाढत जातो* आपण हे जाणून घेतले आहे की , मनुष्याला अविद्या , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश या प्रकारात मोडणारे क्लेश होऊ लागले की , तो अस्वस्थ होतो. हे क्लेश माणसाच्या चित्तात , प्रसुप्त , तनु , विच्छिन्न किंवा उदार या चार अवस्थांपैकी कोणत्या तरी एका अवस्थेत असतात. त्या सर्व अवस्थांची माहितीही आपण घेतलेली आहे. त्यापैकी उदार अवस्थेत असलेल्या वासना अनुकूल परिस्थितीमुळे जागृत झालेल्या असतात.. मनुष्य सोडून इतर योनीतील वासनापूर्तीसाठी कर्मे फक्त शारीरिक मूल्यावर आधारित असतात तर मनुष्य योनीत शारीरिक आणि मानसिक म्हणजे भावभावनावर आधारित मूल्ये प्रभावी असतात. त्यामुळे दोन्ही मूल्यात मतभेद होत असल्याने बौद्धिक मूल्याच्या आधारे कर्माबाबत निर्णय घेतला जातो. माणसाची भोगलालसा सतत वाढती असते आता पुरे असे कधी त्याला वाटतच नाही. त्यात अडथळा आला तर क्रोध , द्वेष , मत्सर आदि मनोविकारांना आपण बळी पडू शकतो हे लक्षात आलेला मनुष्य आपल्याला समाधान कसे मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्या चिंतनातूनच त्याची बुद्धी विकसित होऊ लागते. ती एव्हढी विकसित होते की , त्याला अध्यात्मिक मूल्ये स्फुरू लागतात आणि त्याच्या असे लक्षात येते की , भोगातून तात्पुरता आनंद मिळत असला तरी , कायम टिकणारे समाधान भोगात नसून त्यासाठी इतर काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासठी त्याला साधुसंतांचा सहवास , धर्मग्रंथांचा अभ्यास करावा असे वाटू लागते आणि त्याचा प्रवास भोगाकडून मोक्षाकडे सुरू होतो. प्रारब्धानुसार आलेले भोग तो भोगतो पण त्यात त्याचे मन लागत नाही हा चित्तात वैराग्य सूर्याचा उदय होण्यापूर्वीचा उष:काल होय. यापूर्वी भोगवासना प्रबळ झाली आणि अपूर्ण राहिली तर क्रोध , मत्सर आदि मनोविकारांचा सामनाही करावा लागत असतो पण जसजशी अध्यात्मिक मूल्ये मनात रुजून जोम धरू लागतात , त्याप्रमाणात इंद्रियांचा व मनाचा संयम मनुष्य स्वेच्छेने करू लागतो. एव्हढेच नव्हे तर तो त्याची बुद्धी भोगाच्या पूर्तीसाठी न वापरता अध्यात्मिक विकास कसा होईल याकडे वापरू लागतो. त्यातून त्याच्या असे लक्षात येते की , विषयसुखातून दुःखाचीच निर्मिती होते आणि ते भोगावे लागते म्हणून नित्य सुखदायी आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेऊन ईश्वरात विलीन होणे हाच परम पुरुषार्थ होय. अध्यात्मिक मूल्ये सुस्थिर झाली की , मोक्षाची वासना जागृत होते आणि शुभ , अशुभ वासनांच्या झगड्याल प्रारंभ होतो आत्तापर्यंत शारीरिक , मानसिक आणि बौद्धिक मूल्यांमध्ये जास्तीतजास्त भोग कसे मिळतील हे पाहणे या मुद्द्यावर एकमत असल्याने झगड्याचा प्रश्न येत नाही. शुभशुभाची तेथे काहीच पर्वा नसते पण अध्यात्मिक मूल्ये निर्माण होताच शुभ वासनांचा प्रसार वाढत जातो त्यामुळे अशुभ वासना निष्प्रभ होऊ लागतात. त्याचा परिणाम होऊन शुभ वासनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न सुरू होतात परंतु अशुभ वासनांचा पगडा असा जबरदस्त असतो की , त्या शुभ वासनाना दडपू पाहतात. आत्तापर्यंत शुभ वासना तनु म्हणजे निर्माण होत असतात पण परिस्थिती अनुकूल नसल्याने त्या शांत झालेल्या असतात. आता अध्यात्मिक मूल्यात वाढ झाल्याने त्या विच्छिन्न अवस्थेत येतात. या अवस्थेतील वासना त्यांच्या पूर्तीसाठी परिस्थिती अनुकूल आहे का ? याची सतत चाचपणी करत असतात आणि अध्यात्मिक मूल्यात होत असलेल्या वाढीने ती अनुकूल होत आहे हे लक्षात आले की त्यांचा जोर इतका वाढतो की , साधकाच्या हातून सतत सतकर्मे घडू लागतात त्यामुळे अशुभ वासना , शुभ वासनांच्या रेट्यापुढे दबल्या जातात. हा रेटा पुढे एव्हढा वाढतो की , त्यामुळे अशुभ वासना अत्यंत दुरबल होतात. साधकाला त्यांची पूर्तता करण्याची इच्छा नाहीशीच झालेली असल्याने त्या चित्तात केवळ तनु अवस्थेत म्हणजे स्मृती रूपाने असतात आणि त्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही की , त्या प्रसुप्तावस्थेत जातात. या अवस्थेत त्यांचा चित्तावर कोणताच प्रभाव पडत नसल्याने त्या स्वतःहून कोणतीच क्रिया घडवू शकत नाहीत. साधकाने निर्विचार समाधी साध्य केली की , त्याच्याठिकाणी ऋतंभरा प्रज्ञा उत्पन्न होते आणि त्यामुळे त्याला योग्य काय व अयोग्य काय याची स्पष्ट जाणीव झाल्यामुळे प्रसुप्तावस्थेत असलेल्या भोगवासनांचे संस्कार पूर्णतया नामशेष होतात आणि त्या पुन्हा कधीही जागृत होऊ शकत नाहीत , त्यामुळे आत्मसाक्षात्काराच्या दिशेने कोणताही अडथळा न येता वाटचाल होऊ लागते. क्रमशः

No comments:

Post a Comment