flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग ११ *अज्ञानी मनुष्य अनात्म म्हणजे नाशवंत वस्तूला आत्मा समजून त्यावर जीव जडवून बसतो* अविद्या किंवा अज्ञान हा पहिला क्लेश असून , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश हे इतर चार क्लेश यातूनच निर्माण होतात. हे लक्षात घेऊन अविद्या म्हणजे काय हे आपण सविस्तर समजाऊन घेत आहोत. ज्या गोष्टी कायम टिकणाऱ्या नाहीत , त्या कायम टिकणाऱ्या आहेत असे समजून त्यांना अनावश्यक महत्व देणे , तसेच ज्या कायम टिकणाऱ्या आहेत तिकडे दुर्लक्ष करणे हे अविद्येचे पहिले लक्षण होय. दुसऱ्या लक्षणांमध्ये अपवित्र वस्तू पवित्र मानून तिला अत्यंत महत्व देणे आणि पवित्र वस्तूकडे दुर्लक्ष करणे याचा समावेश होतो. आपले शरीर बघितले तर अपवित्र वस्तुंचे भांडार आहे पण आपण त्याला पवित्र मानतो आणि अत्यंत पवित्र असलेल्या आत्म्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच मांसाहार अध्यात्मिक दृष्ट्या अपवित्र आहे पण त्याबद्दल काहीही विचार न करता जगात कित्येक लोक मांसाहार करतात. पृथ्वीतलावरील लोकसंख्येचा विचार केला असता मांसाहार अपवित्र आहे असे मानणारी माणसे फार थोडी असून त्यांची संख्या भांगेत तुळस म्हणावी इतकी कमी आहे , तरीही भारतात अध्यात्मिक मूल्यांचा आदर करणारी बरीच मंडळी असल्याने इतर देशांच्या तुलनेत मांसाहारी मंडळी कमी आढळतात. काही प्रजाती मांसाहार निषिद्ध मानतातच पण काही समाजात मांसाहार मान्य असला तरी अध्यात्मिक मूल्यांचे महत्व जाणणारी त्या समाजातली काही मंडळी मांसाहार अपवित्र मानतात. तसेच मांसाहार करणाऱ्या काही लोकांनाही मांसाहार अपवित्र आहे हे पटलेले आहे. इतर शारीरिक स्वच्छता करण्याचे महत्त्व पटले असूनसुद्धा ती बेफिकिरपणे वेळच्यावेळी न करणे , ही अपवित्रताच आहे हा सर्व अविद्येचाच भाग होय म्हणून साधकाने सर्वतोपरी दक्षता घेऊन वागावे म्हणजे अविद्येचे संस्कार क्षीण होऊन योगाभ्यास सुखकर होईल. दुःखदायक गोष्टी सुखाच्या आहेत असे मानणे ही अविद्येचे पुढील लक्षण होय. जोपर्यंत माणसाचे वागणे शारीरिक , वैचारिक आणि बौद्धिक मूल्यावर आधारित असते तोपर्यंत ते बहुधा स्वार्थमुलक असते , त्यामुळे त्यात भरमसाठ अपेक्षांचा समावेश असतो आणि त्यातून आपल्याला सुख मिळेल हा विचार असतो. वास्तविक पाहता अपेक्षा ठेऊन स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कोणत्याही कर्मामुळे सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या असं कधीच होत नाही कारण एक अपेक्षा पूर्ण झाली की , त्यातूनच दुसरी अपेक्षा प्रकट होते. त्यामुळे सुख मिळालंय असं वाटत असतानाच कधी ना कधी होणाऱ्या अपेक्षाभंगामुळे ते दुःखदायकच ठरते. वरवर पाहता ते सुखदायक वाटणाऱ्या गोष्टी , माणसाला पहाता पाहता दुःखी करतात म्हणून मुनी सांगतात की , मनुष्य दुःखदायक गोष्टींना सुखदायक मानतो ही अविद्या होय. अविद्येचे चौथे लक्षण म्हणजे अनात्म वस्तूला आत्मा मानणे. आत्मा , प्राण , जीव हे तसे समानार्थी शब्द आहेत. एखाद्याच्या बाबतीत आपण म्हणतो त्याचा जीव अमुक एका गोष्टीत वसलेला आहे किंवा लहान मुलांच्या गोष्टीतील राक्षसाचा प्राण पोपटाच्या डोळ्यात असतो , एखाद्याचा नातू त्याचा अगदी जीव की प्राण असतो पण गम्मत म्हणजे या सर्व गोष्टी आत्म्याशी सबंध नसलेल्या आहेत कारण त्या सर्व नाश पावणाऱ्या आहेत आणि आत्मा तर अविनाशी आहे , चैतन्ययुक्त असल्याने स्वयंप्रकाशी आहे. बाकी सर्व गोष्टी जड आणि परप्रकाशी असतात पण यातलं काहीच लक्षात न घेता अज्ञानी मनुष्य अनात्म म्हणजे नाशवंत वस्तूला आत्मा समजून त्यावर त्याचा जीव जडवून बसतो. ती मिळवताना तो आकाश पाताळ एक करतो. वस्तू मिळाली नाही की , दुःखी होतो आणि समजा मिळाली तरी कालांतराने ती नष्ट झाल्यावर दुःख्खच पदरात पडते म्हणून आत्म्याशी संबंधित नसलेल्या वस्तूला ती आत्म्याशी संबंधित आहे असे समजणे हे अज्ञान होय. म्हणून अनात्म वस्तू आणि आत्मवस्तुतील फरक उमजणे आवश्यक आहे. आत्मवस्तू ही कायम टिकणारी आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेही सुखदायक आहे तसेच ती मिळाल्यावर कधीही नष्ट होण्याची किंवा कुणी हिरावून घेण्याची भीती नसल्याने नेहमी फक्त आनंद आणि आनंदच देत असते. क्रमशः

No comments:

Post a Comment