🙏
*मनीचे भाव ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. स्वत:चे चुकते कुठे हे पाहावे. दुःख भोगण्याची माझ्यावर वेळ आली, म्हणजे माझे काहीतरी चुकलेच, असे समजावे. ज्याला दु:खाचा त्रास होत नाही, तोच खरा समाधानी. ’मी दररोज नामस्मरण करतो, अनेक वर्ष माझी सेवा चुकली नाही, असे आपण म्हणतो; पण 'मी हे सर्व करतो’ अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग ? मी मेहनत घेतो पण थोडक्यात नासते, ते या अभिमानामुळेच ! जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत त्याला ’स्मरण’ कसे म्हणावे ? भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल ? तुमची ही बुद्धी नष्ट झाल्याशिवाय तरणोपाय नाही. सद्गुरूंनी, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. ’भगवंताने माझी आपत्ती दूर करावी, हे म्हणणे वेडेपणाचे आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास ! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो, हे कुठे ध्यानात येते ! उगीच विचार करीत बसू नये. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती तरली, हे लक्षात ठेवा.*
🙏🙏