flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग १३ *जो सपूर्ण क्लेशरहीत असतो तोच साक्षी होऊ शकतो* अज्ञान , अस्मिता आणि राग हे तीन प्रकारचे क्लेश आपण बघितले. क्लेशामुळे माणसाला मनस्ताप होऊन त्याचे मन ध्येयविषयापासून विचलित होत असते. हातचे काम सोडून मनुष्य त्याबद्दलच विचार करत बसतो. माणसाच्या मनाला ताप होण्याचे प्रमुख कारण म्हणजे , माणसाने एखाद्या वस्तूकडे , घटनेकडे किंवा व्यक्तीकडे ती आहे तशी न पाहता ती आपल्याला अनुकूल आहे असे समजून त्या वस्तूकडे बघणे. यातूनच गैरसमज निर्माण होतात. मी कर्ता आहे हाच मुळात आधी एक गैरसमज आहे आणि तोच सगळी सृष्टी आपल्याला अनुकूलच आहे किवा आपण ती आपल्याला अनुकूल करून घेऊ शकतो अशा आणखी एका गैरसमजाला जन्म देतो. वस्तुस्थितीकडे डोळसपणे न पाहिल्याने माणसाचे गैरसमज होतात. हे सर्व अज्ञानापोटी घडते. जो मनुष्य असलेली किंवा येणारी परिस्थिती आहे तशी स्वीकारून त्याबाबत कोणतीही तक्रार न करता पुढे जात असतो त्याच्या हे लक्षात येत असल्याने त्याचे गैरसमज कमी होतात. पुढील अस्मिता हा क्लेशही मी कर्ता आहे , मी म्हणेन तसंच झालं पाहिजे अशा विचारातूनच माणसाला मनस्ताप देत असतो. त्यापुढील क्लेशाचा प्रकार राग असा असून तो मिळणारी सुखे मला कायम मिळत राहावीत , त्यासाठी आवश्यक ती साधने कायम माझ्याजवळ हवीत अशा विचारातून जन्म घेत असतो. अर्थात परिस्थिती सारखी बदलत असल्याने एकच स्थिती कधीच टिकून रहात नाही पण मनुष्य या अज्ञानाकडे सोयीस्कर डोळेझाक करतो. यापुढील क्लेशाची निर्मिती द्वेषातून होते. त्याबद्दल मुनी सांगतात , दुःखानुषयी द्वेष: ।।८।। अर्थ , दुःखाचा अनुभव घेतल्यावर हे दुःख आणि त्यामागची कारणे याबाबतची प्रतिकूल भावना मनात तयार होते आणि त्याबद्दल द्वेष हा क्लेश निर्माण होतो. विवरण , कायम सुख असावे आणि दुःख कधीच वाट्याला येऊ नये या इच्छेतून सतत आपल्या मनासारखे घडावे म्हणून मनुष्य आटोकाट प्रयत्न करत असतो पण सर्वच गोष्टी माणसाच्या मनासारख्या कुठं घडतात ! नेमक्या याच गोष्टींमुळे मनुष्य काय होईल , कसं होईल या विचारांनी सतत चिंतेत असतो. त्यातून त्याला निरनिराळ्या प्रकारचे क्लेश होत असतात. सध्या आपण अभ्यासत असलेला द्वेष हा क्लेश दुःखाबद्दल व ते देणाऱ्या साधनांबद्दल मनात असणाऱ्या तिटकाऱ्यातून निर्माण होतो. अशावेळी माणसामध्ये , आपण कायम ऐश आरामात रहावं असा विचार देणारा रजोगुण प्रभावी असतो आणि तो नेहमीच माणसाला दुःखी करतो. वास्तविक पाहता सुख हेसुद्धा शेवटी दुःखच देत असते कारण सुख जरी मिळाले तरी ती वेळ निघून गेली की , ते संपते आणि मनुष्य त्याच्या आठवणीने दुःखी होतो. जर ते मिळाले नाही तरी तो दुःखी असतो. ही बाब लक्षात घेणाऱ्याची सुखाची ओढ कमी होत जाते. त्याचबरोबर ती सुखे न मिळाल्याने जे दुःख होते ते सहन करण्याची क्षमताही वाढत जाते. या दोन्हीमुळे तो मानसिकरित्या स्थिर होऊन त्याचा सुखदुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे मनाचे स्थिर होणे म्हणजे भोगासाठी धडपडण्याची खटपट कमी होऊन ते असले तर असुदेत , नसले तरी चालतील असे वाटू लागते. त्याला भोगापवर्गथा असे म्हणतात. विशेष म्हणजे परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करण्यास माणसाचं मन तयार व्हावं अशी ईश्वरी योजना त्रिगुणांच्या मार्फत कार्यरत असतेच परंतु त्यासाठी खूप कालावधी जावा लागतो म्हणून योगाभ्यासाच्या माध्यमातून शिस्तबद्धपणे जे प्रयत्न करतील त्यांच्या बाबतीत ही घटना लवकर घडते. योगाभ्यासाचा परिणाम होऊन सुखदुःखांच्याकडे साधक वेगळ्या दृष्टीने बघू लागतो. त्याच्या मानसिकतेत हळूहळू बदल होऊ लागतो. जे मिळेल त्यात तो सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. तसेच वाट्याला येणाऱ्या दुःखाना तो सहन करण्याचा प्रयत्न करतो. सुख कायम असावं व दुःख कधीच वाट्याला येऊ नये या दोन्हीसाठी वेळेनुसार कराव्या लागणाऱ्या पापाचरणाचा तो द्वेष करू लागतो तर सुखदुःखाकडे दुर्लक्ष करून होताहोईतो पुण्याचरण करण्याची त्याला ओढ लागते. पुण्याचरणाबद्दल त्याच्या मनात राग म्हणजे प्रेम उत्पन्न होते. अर्थातच सुखदुःखांकडे पुर्णपणे अलिप्त नजरेने पाहणे हे केवळ साक्षात्कारी व्यक्तीलाच शक्य असल्याने सुखाच्या प्राप्तीसाठी व दुःखांच्या निवृत्तीसाठी साधकाचे प्रयत्न सुरूच राहतात. त्यासाठी त्याला सहेतुक कर्म करावे लागते. त्यामुळे त्याला अधूनमधून राग आणि द्वेष या क्लेशांशी सामना करावा लागतो. यावरून असे म्हणता येईल की , जो संपूर्ण क्लेशरहित आहे तोच जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे स्वस्थ बसून , साक्षी म्हणून पाहू शकतो. क्रमशः

No comments:

Post a Comment