flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग १० *वस्तू आहे अशी न वाटता वेगळीच वाटणे म्हणजे अविद्या होय* साधकाला जोपर्यंत भोगसाधनांची आवड असते तोपर्यंत ओढ , द्वेष इत्यादि क्लेशदायक अशुभ वासना प्रसुप्त , तनु विच्छिन्न आणि उदार अशा अवस्थात क्रमाने विकसित होत असतात. जेव्हा या क्लेशदायक वासनांमुळे दुःख्खच प्राप्त होते अशी खात्री झाल्यावर तो त्यांच्या पुर्ततेच्या बाबतीत उदासीन होतो आणि त्याचे त्याकडे दुर्लक्ष होऊ लागते. साधनेच्या प्रभावाने त्याच्या हातून सतकर्मे आपोआपच घडू लागतात आणि क्लेशदायक वासनांचा अधोगतिकडे प्रवास सुरू होतो. त्याची शक्ती कमी कमी होऊ लागते आणि त्या उदार अवस्थेतून क्रमाने विच्छिन्न , तनु आणि प्रसुप्त अवस्थेत जाऊन चित्तात संस्कारमात्र राहतात. साधकाने निर्विचार समाधी साध्य केली की , त्या संपूर्ण नष्ट होतात. साधकाचा मार्ग निष्कन्टक झाल्याने तो निर्वेधपणे असंप्रज्ञात समाधीत प्रवेश करतो आणि तेथे त्याला आत्मसाक्षात्कार होतो. अविद्यादी दुःखदायक क्लेश देणाऱ्या वासना कशा विकसित होतात आणि साधनेच्या प्रभावामुळे त्यांचे तळपट होऊन त्या संपूर्ण नष्ट कशा होतात यावर सविस्तर चर्चा आपण केली. आता पुढील पाच सूत्रात मुनी प्रत्येक क्लेशावर भाष्य केले आहे. अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या ॥५॥ अर्थ , अनित्य वस्तू नित्य वाटणे , अपवित्र असली तरी पवित्र वाटणे , दुःखरुप असून सुखरूप वाटणे , अनात्म असून आत्मा आहे असे वाटणे म्हणजे थोडक्यात वस्तू आहे अशी न वाटता वेगळ्या प्रकारची आहे असे वाटणे म्हणजे अविद्या होय. विवरण , सर्वसाधारणपणे मनुष्य शाळा कॉलेजातील शिक्षणाला विद्या समजतो पण प्रत्यक्षात ती केवळ माहिती असते. आध्यात्मिकदृष्ट्या विद्या किंवा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाशवंत म्हणजे अनित्य वस्तुंना मनुष्य नित्य म्हणजे कायम टिकणाऱ्या वस्तू असे समजून त्याचा सर्व व्यवहार चालू असतो. वास्तविक पाहता प्रत्येक वस्तूचे दुसऱ्या वस्तूत रूपांतर होण्याचे कार्य दिवसरात्र चालू असते. आपला देहही सतत बदलत असतो. काम करून थकलेल्या पेशींची जागा नवीन पेशी घेत असतात म्हणून आपला देहही अनित्यच आहे पण आपल्याला मात्र तो कायम टिकणारा वाटतो. ज्याप्रमाणे नदीचा जलप्रवाह कायम पुढे जात असतो पण आपल्याला मात्र ती कायम एकाच जागी असलेली नदी वाटते त्याप्रमाणे आपल्याला आपला देहही नित्य वाटतो. अपवित्र असलेल्या पदार्थाना पवित्र मानणे हीही अविद्याच होय. रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा , मल , मूत्र इत्यादि पदार्थांचा एकत्र केलेला गोळा म्हणजे देह. ह्या सर्व वस्तू तसं बघायला गेलं तर अपवित्र आहेत पण अशा देहाला पवित्र समजून आपण त्याचे किती लाड करत असतो आणि त्या उलट अत्यंत पवित्र , निर्मळ असलेल्या आत्म्याकडे आपले दुर्लक्ष होते.. त्यामुळे देह म्हणजे मी ही कल्पना उराशी बाळगून आपण आयुष्यभर वावरत असतो हीच अविद्या होय. शरीराच्या बाहेरच्या गोष्टीतील काही गोष्टी इतरांना अपवित्र वाटतात तर काहींना त्यात अपवित्रपणा जाणवत नाही. उदाहरणार्थ अंडी , मांस भक्षण करणे हे काही लोक अपवित्र मानतात तर काही लोक आवडीने त्यांचे भक्षण करतात. अशा प्रकरणी पवित्र काय आणि अपवित्र काय याचा निवाडा कसा करावा ? याबाबतीत असे म्हणता येईल की , अंडी , मांस खाणाऱ्या कुळात जन्म झाल्यामुळे , ते लहानपणापासून ते खात असल्याने त्यांना ते पदार्थ खाण्यास अपवित्र वाटत नाहीत. याबाबत पुढे असा विचार करता येईल की , अशा लोकांनी मागील जन्मी वाघ , सिहाच्या योनीत जन्म घेतलेला असल्याने त्या जन्मीचे संस्कार जागृत होऊन त्यांना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्याने त्या इच्छांची पूर्ती होत असते. म्हणजे मांसाहारापूरते तरी हे लोक वाघ सिहापेक्षा अधिक उत्क्रांत झालेले नसतात कारण मनोविकारांच्या आधीन होऊन कुणी मांसाहार करत असल्याचे दिसत नाहीत. ज्यांचे व्यवहार शारीरिक , वैचारिक आणि बौद्धिक मूल्यावर आधारित असतात ती एक ना अनेक कारणे देऊन मांसाहार करणे कसे योग्य आहे याचे समर्थन करत असताना दिसतात पण ज्यांच्यात अध्यात्मिक मूल्ये विकसित झालेली आहेत त्यांनी मात्र मांसाहार अपवित्र ठरवला आहे. क्रमशः

No comments:

Post a Comment